Bhusaval News: मनमाडचा समावेश असलेल्या भुसावळ रेल्वे विभागाने एप्रिल २०२६ मध्ये अनधिकृत आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या १ लाख ९ हजार प्रवाशांकडून दंड म्हणून १२.२३ कोटींची विक्रमी रक्कम वसूल केली. विना तिकीट प्रवास कारवाई टाळण्यासाठी प्रवाश्यांनी वैध तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. भुसावळ विभागाने तिकीट तपासणीध्ये नवा विक्रम केला आहे. यापूर्वी विभागाची सर्वोच्च मासिक कामगिरी मे २०२५ मध्ये ११.२० कोटी इतकी नोंदवली गेली होती. आता एप्रिल २०२६ मध्ये विभागाने हा विक्रम मागे टाकत तब्बल १२.२३ कोटी रुपये महसूल इतिहासातील सर्वोच्च मासिक उत्पन्नाची नोंद केली आहे.
एप्रिल २०२६ दरम्यान विभागात एकूण १ लाख ९ हजार प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यांचा दंडाचा तपशील पुढीलप्रमाणे –
* अनियमित प्रवासाच्या एकूण ४४,७३८ प्रकरणांमधून २.१८ कोटी.
* विनातिकीट प्रवासाच्या एकूण ६३,६०८ प्रकरणांमधून ६.७० कोटी
*एकूण ४०४ बुक न केलेल्या सामान प्रकरणांमधून ५० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकिट प्रवासाबाबत मध्य रेल्वेचे शून्य-सहिष्णुता धोरण कायम असून प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन केले आहे






