Mumbai News: राज्यातील मंडप व्यावसायिकाना येणाऱ्या अडचणी आणि प्रशाशाकीय पातळीवर होणाऱ्या त्रासाबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या मंडप व्यवसायाला तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. कोरोना काळातील आर्थिक फटका, परवानग्यांची गुंतागुंत आणि रोजगाराच्या अस्थिरतेचा सामना करणाऱ्या या क्षेत्राला अत्यावश्यक सेवेचा व उद्योगाचा दर्जा देऊन विविध कल्याणकारी सुविधांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.
आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मंडप व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या, मंडप व्यवसाय हा केवळ विवाह सोहळे किंवा धार्मिक कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही. सरकारला नैसर्गिक आपत्ती, शासकीय कार्यक्रम, निवडणुका, आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक उपक्रम यासाठी मंडप यंत्रणा रात्रंदिवस काम करत असते, सुख-दुःखात या व्यवसायाची भूमिका महत्त्वाची असते. कोरोना काळात या क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला, त्यावेळी ही यंत्रणा आपले काम करत होती. मात्र आता मंडप यंत्रणेला प्रशासकीय त्रासाला सामोरे जावे लागत आहे. केटरिंग आणि मंडप साहित्याची रात्री-बेरात्री वाहतुक केली जाते. मात्र रात्री ११ नंतर त्यांना साहित्याची ने आण करण्यावर बंदी आहे, आरटीओ कडून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या वाढते खर्च आणि नियमांच्या गुंतागुंतीमुळे हा व्यवसाय संकटात आहे. आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे, व्यवसायिक स्वतः व्यवसाय करतात त्यांना कोणी कर्ज देत नाही, तरी अनेक कामगार या व्यवसायात काम करत आहे. प्रशासकीय स्तरावरील त्यांना अडचणी सोडवण्यासाठी संबंधित विभागात एक बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आ महेश लांडगे यांनी मंडप व्यावसायिकांच्या प्रश्नांची जाण राखत विधानसभेचे लक्ष वेधल्याने अमळनेर येथील सिद्धिविनायक टेन्ट हाऊसचे संचालक तुळशीराम हटकर आणि नगरसेविका सुवर्णा तुळशीराम हटकर यांनी मंडप व्यावसायिकांच्यावतीने आ. लांडगे यांचे आभार मानले आहे.










