Jalgaon News: देशातील न्यायप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार्या नवीन भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि जुन्या कायद्यांमधील फरक व त्यातील नवीन उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हॉलमध्ये विशेष पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत माध्यमांच्या प्रतिनिधींना कायद्यातील बदलांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि पी.आय ज्ञानेश्वर धारबडे यांनी कायदे विषयी अधिक माहिती दिली. कायद्याचे ज्ञान, समाजाचे कल्याण, ब्रिटीशकालीन कायदे बदलून आता सरकारने भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन कायदे लागू केले आहेत. या नवीन कायद्यांमुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, गुन्ह्यांचे वर्गीकरण आणि शिक्षेच्या तरतुदी याबाबत पोलीस प्रशासनाकडून सादरीकरण करण्यात आले.
प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया (वेब न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया प्रतिनिधी) यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पत्रकारांच्या शंकांचे निरसन करताना पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, कायद्याची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हे पोलीस आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. सकारात्मक परिणाम या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय निर्माण होण्यास मदत झाली आहे.
नवीन कायद्यांची अंमलबजावणी करताना नागरिकांना नेमका काय फायदा होईल आणि पारदर्शकतेसाठी सरकारने कोणत्या नवीन उपाययोजना केल्या आहेत, हे आता प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचणार आहे. जळगाव पोलीस दलाच्या या पारदर्शक आणि संवादप्रिय भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.






