Letest Weather News: मुंबई हवामान विभागाने आज रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने २७ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. दि.२३ ते २६ जून दरम्यान कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज दि. २३ जूनला मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुढील ४८ तासांत नैऋत्य मोसमी वारे मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्रात पुढे सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

या जिल्ह्याना येलो अलर्ट
राज्यात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नाही, येत्या ४८ तासात तो महाराष्ट्रात सर्वत्र सक्रिय होईल, असा अंदाज आहे, मुंबई हवामान विभागाने राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आदी २७ जिल्हयांना येलो अलर्ट दिला आहे.
कोकणात ६० प्रतितास वेगाचे वारे
मंगळवारी आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ४० ते ५० किमी वेगाचे वादळ राहणार आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भात काही ठिकाणी ‘उष्ण रात्री’ची स्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी वेगाने झोतांसह ६० किमी प्रति तास वारे वाहण्याची शक्यता आहे.
मान्सून ४८ तासात मुंबईसह महाराष्ट्रात
सोमवारी नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकले, मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा उर्वरित भाग, छत्तीसगडचा काही भाग, तसेच ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकले आहेत. अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बलांगीर, सुंदरगड, चत्रा, गया, मुझफ्फरपूर आणि पूर्व सरकत आहे. पुढील ४८ तासांत नैऋत्य मोसमी वारे मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओडिशाचा उर्वरित भाग, तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.






