Jalgaon News: काही प्रकार हे असंवेदशीलतेचा ही कळस गाठतात, अशीच एक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अमळनेर शहरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर एका बेवारस मृतदेहाची दफनविधीसाठी चक्क शहरातील एक कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकाराने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहिती अशी की, अमळनेर शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याऐवजी तो थेट कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीत ठेवून दफनभूमीकडे नेण्यात आल्याचा असंवेदनशीलपणा उघड झाल्याने माणुसकी सपंली की काय असा सवाल उपस्थित होतो. या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या सन्मानाची पायमल्ली झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नियमांची सर्रास पायमल्ली
नगरपरिषदेच्या नियमानुसार शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा दफनविधीसाठी स्वतंत्र आणि योग्य वाहनाची व्यवस्था करणे संबंधित कचरा संकलन ठेकेदारावर बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात संबंधित ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसवत कचरा वाहतुकीच्या वाहनातूनच मृतदेहाची वाहतूक केली. त्यामुळे केवळ नियमांचे उल्लंघनच नव्हे तर मानवी संवेदनशीलतेचाही कळस केल्याची चर्चा होत आहे. या प्रकाराने सावत्र संतप्त संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अंतिम निरोप मिळावा, ही समाजाची नैतिक जबाबदारी असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत लज्जास्पद प्रकार घडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विविध सामाजिक संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
प्रशासनकडून कारवाईचा इशारा
दरम्यान अमानवीय वागणूकीचा या प्रकरणाची गंभीर दखल नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी घेतले असून संबंधित ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. अशा प्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि दोषींना पाठीशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनीही संबंधित ठेकेदाराने अक्षम्य चूक केल्याचे मान्य केले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्पष्ट कार्यपद्धती राबवावी, अशी मागणी सामाजिक संघटना, नागरिक आणि विविध स्तरांतून केली जात आहे.










