Jalgaon News : नोकरीच्या नावावर तरुणांना फसविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. अशात ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक झाल्याचा संतापजणक प्रकार जळगावातून समोर आला आहे. तरुणांनी फसवणूकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परीक्षास्थळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
कृषीमित्र पदाच्या परिक्षेसाठी जिल्हाभरातील 350 हून अधिक तरुण विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. 25 हजार मानधनाऐवजी कृषी उत्पादन विक्रीवर कमिशन मिळेल, असे सांगितल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा घेणाऱ्या कोऑर्डिनेटरला जाब विचारला आहे. फी परत करुन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. कृषी विभागानेही विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रोडक्टसंबंधी कागदपत्रे मागवली आहेत.
याबाबत माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी संस्थेमार्फत ‘कृषी मित्र’ पदासाठी जळगावसह राज्यभर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार जळगावातील एका महाविद्यालयात जिल्हाभरातील 350 हून अधिक तरुण विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. मात्र परीक्षास्थळी हॉलतिकीट न देता, ऑनलाइन अर्ज करताना सांगितलेले 25 हजार मानधन नाकारण्यात आले. तसेच मानधना ऐवजी कृषी उत्पादन विक्री करून कमिशन मिळेल, अशी माहिती देण्यात आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. यामुळं संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत भरलेली परीक्षा फी परत मिळावी आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. दरम्यान, या महाविद्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांसह जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संबंधित कंपनीने या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. त्या दृष्टीने तपास केला जाईल असे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संबंधित कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. कागदपत्रे बनावट आढळल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनी फसवणुकीबाबत स्वतंत्रपणे पोलिसांत तक्रार दाखल करावी, असेही सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित कंपनीच्या समन्वयकाला चौकशीसाठी पोलिसांनी पोलिस स्थानकात बोलावले असून पुढील तपास सुरू आहे.










