Mumbai News: उद्योग क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या Artificial Intelligence (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः MSME क्षेत्राने AI तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई च्या २०२६–२०२८ या कार्यकाळातील अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा शनिवार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, गृहराज्य मंत्री पंकज भोईर, उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य तथा आमदार राहुल आवाडे, माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, बाबूराव कदम-कोहळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
या सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, उपाध्यक्ष किरण भोसले, उपाध्यक्ष संतोष राणे, उपाध्यक्षा सौ. सुनीता फाल्गुने, उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष सर्जेराव नलावडे, उपाध्यक्ष सुनील किर्दक, उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटिया, विशेष निमंत्रित वेदांशू पाटील आणि सर्व गव्हर्निंग कौन्सील सदस्य यांनी पदग्रहण केले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे सर कार्यवाह सुरेश घोरपडे उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) च्या नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी अध्यक्षीय चषक स्वीकारून अध्यक्षपदाचा पदभार ग्रहण केला.
गाव तेथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे विशेष कौतुक करत, प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करण्याची ही संकल्पना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात उद्योजकता वाढवून रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौरऊर्जा मॉडेल उपयुक्त
त्यांनी सौरऊर्जा मॉड्यूलचा उल्लेख करत, हे मॉड्यूल उद्योग, शेती आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. हे मॉड्यूल लवकरात लवकर महाराष्ट्र चेंबरसमोर सादर करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. उद्योग, व्यापार, कृषी, नवउद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र चेंबर अधिक प्रभावी योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








