Jalgaon News: येथील धनाजी नाना विद्या प्रबोधिनीत लोकसेवक बाळासाहेब स्व. मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याचे त्यांच्या पुण्यतिथीदिनी माजी सरन्यायाधिक्ष भूषण गवई यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. याप्रसंगी धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर जाहीर कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरन्यायाधिश भूषण गवई, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यात प्रामुख्याने शिक्षण, राजकारण, समाजसेवा आदी क्षेत्रांमधील मातब्बर व्यक्तीमत्वांचा समावेश होता. यात प्रामुख्याने माजी कुलगुरू एन.के. ठाकरे, के.बी. पाटील, आर.एस. माळी आदींसह शिवाजीराव पाटील, पी.पी. पाटील, प्र कुलगुरू एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आदी मान्यवरांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी युवा नेते धनंजय चौधरी यांनी आपल्या मनोगतातून हा कार्यक्रम म्हणजे फक्त एका पुतळ्याचे नव्हे तर विचारांचे अनावरण असल्याचे नमूद केले. धनाजी नाना विद्या प्रबोधिनीचे सचिव पी. आर. चौधरी यांनी प्रास्ताविकातून धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या शुभारंभापासून तेh वाटचालीचा आराखडा प्रस्तुत केला. यात त्यांनी संस्थेच्या 32 वर्षांच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे उलगडून सांगितले.
राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणातून कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा गौरव करत जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणीक क्रांतीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचा गौरव केला. माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेबांनी आयुष्यात अनेक संस्था उभारल्या असल्या तरी त्यांनी शैक्षणिक साम्राज्य उभे केले नसल्याचे नमूद करत त्यांच्या कार्याचा वारसा सर्व जण नेटाने पुढे नेत असल्याचे सांगितले.
देशाचे माजी सरन्यायाधिश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात चौधरी आणि गवई या दोन्ही कुटुंबांमधील भावबंधाला उजाळा देतांना कै. बाळासाहेब चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला. धनाजी नाना यांचा वारसा हा शिरीषदादांच्या नंतर धनंजय चौधरी हे समर्थपणे पुढे नेणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात स्व. मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा गौरव करतांना त्यांचे केवळ राजकीय, शैक्षणीक वा सामाजिकच नव्हे तर भूदान चळवळीत देखील मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. आजच्या अंधकारमय राजकीय स्थितीत त्यांचे विचार हे प्रेरणादायी असल्याचे देखील ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटची संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणीक आदी क्षेत्रांसह समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले.









