Rohingya Boat Tragedy: म्यानमारच्या अल्पसंख्याक रोहिंग्या समुदायातील लोकांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात बुडाल्या आहेत. हृदयद्रावक अशा या घटनेत 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या दोन्ही बोटी जूनच्या अखेरच्या आठवड्यात म्यानमारच्या रखाईन प्रांतातून निघाल्या होत्या. या बोटींमध्ये रोहिंग्या शरणार्थींची संख्या सर्वाधिक होती. UNHCR आणि IOM नं दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे आलेल्या पुरानं सागरी प्रवास आणखी जोखमीचा झाला. मृतांचा नेमका आकडा स्पष्ट होऊ शकलेला नाही. मात्र, दोन्ही बोटीमध्ये 500 पेक्षा जास्त लोकं होती. यातील काही जण सीमेपलीकडे असलेल्या बांग्लादेशच्या रेफ्युजी कॅम्पमधून आले होते. जवळपास 250 प्रवासी असलेल्या पहिल्या बोटीचा संपर्क प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच तुटला होता. तर 280 प्रवाशांना घेऊन जाणारी दुसरी बोट म्यानमारच्या अयेयारवाडी किनाऱ्याजवळ बुडाली.
हिंसाचारापासून वाचण्यासाठी रोहिंग्या निर्वासित अनेकदा धोकादायक सागरी मार्गांचा अवलंब करतात. जून आणि जुलै महिन्यांतील मान्सूनमुळे समुद्रात प्रचंड लाटा उसळण्याची भिती असते. क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या बोटींचे अपघात या निर्वासितांसाठी जीवघेणे ठरले आहेत. मदत आणि बचाव यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.









