Latest Weather News: जळगाव मध्ये हलका आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यात पावसाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. शुक्रवारी तापमान ३६.४ अंश सेल्सियस इतके होते. शनिवारी देखील तापमान तसेच असून वातावरणात उकडा जाणवत असल्याने नागरीकांना हैराण केलं आहे. तसेच धरणात पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. आता पावसाची आवश्यकता असून पावसाने पाठ फिरवल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर गंभीर होईल, आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी सद्या पावसाची गरज आहे. दि. १८ ते २१ जुलै दरम्यान धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि घाटमाथा परिसरात हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला आहे. या ठिकाणी हलका आणि माध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर अहिल्यानगरला येलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सोसाट्याचा वारा वाहणार
दि. १९ जुलैला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. दि.२० व २१ जुलैला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने (आणि ६५ किमी प्रतितास वेगाचे झोत असलेला) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दि. १९ ते २१ जुलैला कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी; आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाचा अंदाज
१८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१९ जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या व आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.








