Uddhav Thackeray Statement: सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला हळूहळू पाठिंबा वाढत आहे. जंतर मंतरवरील उपोषणाला १६ दिवस झाले असून, आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती खूप खालावली आहे. २० तारखेच्या आंदोलनाआधी जंतर मंतरवर काही गुंड पाठवून हिंसाचार करायचा आणि आंदोलन उधाळण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला समर्थन जाहीर करत दि. २० रोजीच्या दिल्लीतील आंदोलनाला देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन ही त्यांनी केले.
सरकारला काही देणेघेणे नाही
यापूर्वी अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा सुषमा स्वराज यांनी भाषण केले होते. तेव्हा चर्चेला विलासराव देशमुख गेले होते. एखाद्या व्यक्तीकडून काम होत नसेल, तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेऊन त्याठिकाणी सक्षम व्यक्तीची नियुक्ती केली तर गैर काय आहे. असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. मी काही दिवसांपूर्वी सोनम वांगचूक यांना फोन करुन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तुम्ही प्राणांतिक उपोषण करु नका, या सरकारला काही देणेघेणे नसल्याचे सांगितले.पण, ते म्हणाले की, “मेरा कुछ भी होने दो, देश का भला होना चाहिए.” अशा व्यक्तीसमोर काय बोलायचे. हे सरकार असंवेदनशील आहे. अशी टीका त्यांनी केली.

२० तारखेच्या आंदोलनाला खासदारांनी यावे
याविरोधात २० जूनला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला देशातील सर्व खासदारांनी उपस्थित राहावे. तसेच माणुसकी शिल्लक असेल तर, भाजपमधील खासदारांनीही आंदोलनाला आले पाहिजे,. हा देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.
आंदोलन उधळण्याचा कट
अभिजीत दिपके देशातील युवकांचा आवाज उठवत आहे. हे युवक सुशिक्षित आहेत. २० तारखेला मोर्चा आहे, त्याच्याआधी काही गुंड सोडून हिंसाचार माजवून आंदोलन उधाळण्याचा डाव आहे. केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे. देशातील युवकांनी नाहीतर पालकांनीही जागे झाले पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही, देशाचा आहे. असे ते म्हणाले.









