Jalgaon News: लग्नाच्या आनंदावर काळाने घाला घालत अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता विद्यापीठाजवळ घडली. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटना अशी घडली
मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१) हिचा विवाह ७ जुलै रोजी जळगाव येथील देवराम नगर, दादावाडी परिसरातील विजय काशिनाथ पाटील (वय २६) यांच्याशी मोठ्या थाटात झाला होता. शुक्रवारी नवविवाहित दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी जाऊन आले होते. रविवारी दि.१३ जुलै रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता वैशालीला माहेरी कोळपिंप्री येथे सोडण्यासाठी तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील (वय ४०) हे मोटारसायकलवर घेऊन निघाले होते. शहरातील विद्यापीठाजवळ पोहोचताच जळगावकडून भरधाव आलेल्या वॅगनार कारने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.

काका गंभीर जखमी
या भीषण धडकेत वैशाली रस्त्यावर जोरात आपटल्याने गंभीर जखमी झाली, तर प्रवीण पाटील यांच्या पायाचे हाड मोडले. अपघातानंतर दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी वैशालीला तपासून मृत घोषित केले. तर प्रवीण पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
सहा महिन्यापूर्वीच वर पोलीसात भरती झाला
नवविवाहित वैशालीच्या हातावरील मेहंदी पुसायच्या आधीच काळाने तिच्यावर झळप घातल्याने जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. अवघ्या आठ दिवसांपूर्वी नव्या संसाराची स्वप्ने पाहणार्या वैशालीच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोळपिंप्रीसह दादावाडी परिसरात शोककळा पसरली आहे. वर विजय काशीनाथ पाटील हा सहा महिन्यांपूर्वी पोलिसात भरती झाला असून जळगाव येथील मुख्यालयात कर्तव्यावर आहे. वैशाली हीच्या पश्चात एक बहिण व आई, वडील असा परिवार आहे.








