Pune Mubai Missing Link: विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आपल्या भाषणात मिसिंग लिंकवरुन राजकारण करु नका असे सांगितले होते. त्यावर मनसे [प्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले, वाह रे, त्याचं राजकारण करु नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण, आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय केलं? दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? असा रोखठोक सवाल करून, आता अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, अशी ओरड करत आहात, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.
मुंबईतील मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आज राज ठाकरे बोलत होते. मिसिंग लिंकच्या दुर्घटनेवर राजकारण करुन महाराष्ट्राचा अपमान करु नका, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाचा राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. राज ठाकरे म्हणाले, लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकारविरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जातं, मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का, असा जळजळीत सवाल राज ठाकरे यांनी केला. राज म्हणाले, आता सरकारला लोक ज्या शिव्या घातल्या आहेत, ते गेली अनेक वर्षे तुमच्याकडूनच सुरु आहे, विरोधकांना वाटेल ते बोल, शिव्या घालाल, हे तुमच्याकडूनच सुरु होते. आता या गोष्टी अंगलट आल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला आहे. या सगळ्या गोष्टी आपणच सुरु केल्या होत्या, अशी टिप्पणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले, मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे बांधकाम आहे. यावरुन राजकारण करणाऱ्यांना बघून घेऊ. अरे तू मुख्यमंत्री आहेस ना, बघून घेऊ काय? हे सगळे बोलल्यानंतर मुख्यमंत्री अचानक हिंदीतून बोलायला लागले. ते कोणासाठी हिंदीत बोलत होते, समोरचे आमदार मराठी, विधानसभा महाराष्ट्राची आणि आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. हे कशासाठी आणि कोणासाठी होतं? याबाबत ही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मुंबई, ठाणेसह महाराष्ट्राच विचका झाला आहे, त्याला हे सरकार विकास बोलत आहे. सगळेकडे इमारतीचे बांधकाम सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी सगळी बांधकामं बंद करावी, रस्ते आणि उड्डाणपूल बांधले म्हणजे विकास नव्हे, मिसिंग लिंकचं उद्घाटन १ मे रोजी झाले होते, आता जुलै महिन्यात त्यामधून पाणी वाहत आहे, ६० ते ६५ दिवसांत नवा टनेल गळायला लागला. मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटनावेळी मिसिंग लिंकसाठी सामान वेगवेगळ्या देशातून आणलं आहे, हे सांगत होते. पण हे सगळं भारतीय कंत्राटदाराकडे दिलं की, ते करायचं तेच करतात. काही कंत्राटदार सांगत आहेत की, त्यांना मिळणाऱ्या कंत्राटातील ५६ टक्के पैसे सरकारमधील लोकांना द्यावे लागतात, असा आरोप ही केला.











