Wangchuk Hunger Strike: बहुचर्चित नीट पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील कथित अनियमिततेच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला शुक्रवारी २० दिवस पूर्ण झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक २८ जूनपासून उपोषणावर आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा, एनसीपी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज सामाजिक कार्यकतें सोनम वांगचुक यांची भेट घेतली. दरम्यान वांगचूक यांचे वजन कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांचे वजन नऊ किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे आणि त्यांचा रक्तदाबही सतत कमी होत आहे. डॉ. सतीश लांबा यांनी सांगितले की, दीर्घकाळ अन्न न खाल्ल्यामुळे त्यांचे शरीर लक्षणीयरीत्या अशक्त झाले आहे. दरम्यान २० जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे सीजेपीतर्फे सांगण्यात आले आहे.
वांगचूक यांच्या आरोग्याबाबत डॉक्टर काय म्हणाले
तसेच यावेळी डॉ. सतीश लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांचे वजन आज ५६.५५ किलो नोंदवले गेले असून, गेल्या २४ तासांत ३५० ग्रॅम वजन कमी झाले आहे. त्यांचा रक्तदाब १०८/६८, रक्तातील साखर ७० मिलीग्राम/डीएल आणि हृदयाचे ठोके ७२ प्रति मिनिट आहेत. डॉक्टरांनी सौम्य निर्जलीकरण झाल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या मते, दीर्घकाळ अन्न न खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी कमी झाली आणि त्यानंतर स्नायूंचेही नुकसान झाले. आता तिसऱ्या टप्प्यात, अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांनी घेतली वांगचुक यांची भेट
दरम्यान सोनम वांगचूक यांना अनेक लोकांचा पाठींबा मिळत आहे. खा. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण, समाजवादी पार्टीच्या खा. डिंपल यादव, आ. प्रिया सरोज, आपचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी वांगचूक यांची जंतर मंतर येथे जाऊन भेट घेतली. सलग २० व्या दिवशी उपोषणावर बसलेल्या कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पाठींबा दिला.
..तर मी भूत म्हणून परत येईन
दरम्यान, उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांनी सांगितले, “मी २० जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहीन, जेणेकरून मी तुम्हा सर्वांसोबत संसदेवर मोर्चा काढू शकेन.” जर २० जुलैचा आमचा मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मी भूत म्हणून परत येईन.
दरम्यान, सरन्यायाधीश पक्षाने (CJP) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, २० जुलै रोजी, जंतर मंतर ते संसद भवन असा शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सरन्यायाधीश पक्षाने देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता या या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत.









