Jalgaon News: जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एका ‘आयएएस’ (IAS) अधिकाऱ्याची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून, नवनियुक्त आयुक्त आदित्य जीवने यांनी शहराचा कारभार हाती घेऊन अवघे 29 दिवस झाले आहेत. या काळात त्यांनी स्वतः रात्री बेरात्री एकटे फिरून संपूर्ण शहरात फेरफटका मारत प्रत्यक्ष नागरिकांकडूनही समस्याबाबत रडगाणं ऐकून घेतल्याने बुधवारी झालेल्या मनपाच्या महासभेत त्यांनी शहरात विविध समस्यांचा भडीमार असल्याने त्या एकाच दिवसात सोडवणे शक्य नाही आणि मी जरी आयएएस अधिकारी असलो तरी माझ्याकडे जादूची कांडी नाही, असे बोलून दाखवत शहराच्या हिताचे निर्णय घेतांना मला सर्व पक्षीय नगसेवकांची सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आता याच वाक्याला हेरून महापालिकेला पहिल्यांदाच आयएएस दर्जाचा तरुण आणि उच्चशिक्षित अधिकारी मिळाल्यामुळे जळगावकर आणि नगरसेवकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. “आयुक्त साहेब, आता जादूची कांडी फिरवा आणि जळगाव शहर वाचवा,” अशीच आर्त हाक सध्या जळगावकरांमधून दिली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहर रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन आणि थकीत प्रशासकीय कामांच्या विळख्यात अडकले आहे. खड्ड्यांचे साम्राज्य, रखडलेली भुयारी गटार योजना आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे शहराचा विकास खुंटल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र, आदित्य जीवने यांच्या रूपाने एक कडक आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी मिळाल्याने आता जळगावचा चेहरामोहरा बदलेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

पक्षभेद विसरून अनेक नगरसेवकांनी नव्या आयुक्तांचे स्वागत केले असून, शहराच्या विकासासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासकीय कामांना गती देणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि प्रलंबित विकासकामांच्या फाईल्स मार्गी लावणे याला नवे आयुक्त प्राधान्य देतील, असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
तरुण आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांच्यासमोर जळगाव शहराचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान आहे. महापालिकेची आर्थिक घडी बसवणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही त्यांची प्राथमिकता असेल. आता नव्या आयुक्तांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा जळगाव शहराला किती फायदा होतो आणि जळगाव खरोखरच विकासाच्या मार्गावर धावणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








