Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बाहेरचं खाणं अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलं आहे. चटकदार चव, आकर्षक सादरीकरण आणि सहज उपलब्धता यामुळे हॉटेल किंवा फास्ट फूडची मोहिनी पडते; मात्र त्याचे परिणाम आरोग्यावर जाणवू लागले की आपण विचार करतो, बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर इतकी तहान का लागते? या लेखात जाणून घेऊया यामागील कारण.
मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणातील मीठ (सोडियम) आणि तेल. बाहेरील पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी अधिक मीठ, मसाले आणि प्रक्रिया केलेले घटक वापरले जातात.
शरीरात सोडियम वाढल्यावर द्रव संतुलन बिघडते आणि मेंदू अधिक पाण्याची मागणी करतो. त्यामुळे वारंवार तहान लागते. याशिवाय तेलकट आणि जड अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक श्रम करावे लागतात, ज्यामुळे पाण्याची गरज वाढते.
अस्वच्छता हेही एक मोठं कारण
अस्वच्छता हेही एक मोठं कारण आहे. अन्न तयार करताना स्वच्छ पाणी, भांडी किंवा हात न वापरल्यास जंतुसंसर्ग होऊ शकतो. बासी अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ, जास्त तिखट-मसाले आणि कृत्रिम रंग-फ्लेवर यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, जुलाब किंवा अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. निकृष्ट पाण्यामुळे टायफॉईड किंवा कावीळसारखे आजारही होऊ शकतात.
याउलट घरचे ताजे, संतुलित आणि स्वच्छ अन्न पचनासाठी हलके आणि आरोग्यास पोषक असते. त्यामुळे शक्य तितके घरचे अन्न प्राधान्याने खावे.
बाहेर खाणे टाळता येत नसल्यास स्वच्छ ठिकाण निवडणे, अतितेलकट पदार्थ टाळणे आणि शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. योग्य सवयींमुळेच चांगले आरोग्य टिकवता येते.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)











