Chopada News: तालुक्यातील वर्डी, गरताड, कुरवेल या गावांमधील ग्रामस्थांसह मका, केळी व इतर शेत पीक नुकसानीचा आढावा घेत दि.3 रोजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच कुरवेल येथील जिल्हा परिषद शाळेचे वादळी पावसामुळे नुकसान झाले. या शाळेला भेट देऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली.
तालुक्यातील सर्व नुकसान बाधित गावांमध्ये तात्काळ पारदर्शक पंचनामे करून एकही नुकसान बाधित शेतकरी वंचित राहू नये, याबाबत काळजी घेण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. एमएसईबी अधिकारी यांच्याकडून नुकसानीबाबत आढावा घेऊन आवश्यक सर्व उपाययोजना करून शहरी व ग्रामीण (कृषीसह) वीजपुरवठा लवकरात लवकर सुरवात करण्याबाबत आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी निर्देश दिले. यावेळी भाऊसाहेब थोरात तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी अंजली बर्गे, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, एमएसईबी अधिकारी बोरसे तसेच क्षेत्रीय महसूल, कृषी, ग्रामविकास कर्मचारी उपस्थित होते.
अडावद येथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊसाने शेतकर्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत सापडला आहे. ऐन पिक काढणीच्या वेळेस गहू, ज्वारी, बाजरी कांदा, केळी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी राजा चार महिने काबड कष्ट करून लहान मुलांप्रमाणे पिकांचे संगोपन करतात. त्यात लोडशेडींगसह विविध अडचणींना सामोरे जावून काळ्या आईच्या कुशीत पीकं फुलवित असतात. अन् शेवटच्या क्षणी अशा अवकाळी पावसामुळे धान्य घरात येण्याचे वेळेस पीक जमीनदोस्त होऊन तोंडचा घास निसर्ग हिरावून नेत असेल तर शेतकर्यांनी जगायचे तरी कसे? असा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजाचा पुरता खचून गेला आहे. जगाच्या पोशिंद्याला भीक मागायची वेळ येऊन ठेपेल. त्या आधीच शासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शेतकर्यांमधून व्यक्त केले जात आहे.





