Jalgaon News: वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय समस्यांविषयी समाजात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकसंख्यावाढीचे गंभीर परिणाम ओळखून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि देशाच्या शाश्वत विकासाला गती देणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट असून कुटुंब नियोजनासह जनजागृतीवर विशेष भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी सांगितले.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी गुरुवार दि. 16 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर उपस्थित होते.

लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी केवळ शासकीय योजना पुरेशा नसून, कुटुंब नियोजन शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, दर्जेदार आरोग्य सेवांची उपलब्धता आणि जबाबदार पालकत्व या घटकांना समाजात प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या दिनानिमित्त सर्वांनी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजून घेऊन नैसर्गिक व सामाजिक संसाधनांचा योग्य व समतोल वापर करण्याचा आणि समाजात कुटुंब नियोजनाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण करण्याचा दृढ संकल्प करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगत
जळगाव जिल्ह्यात लोकसंख्या नियंत्रित राहावी यासाठी जिल्हा परिषद व आरोग्य विभागामार्फत ‘कुटुंब कल्याण कार्यक्रम’ अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अंतर्गत नागरिकांना कुटुंब नियोजनाची विविध साधने वापरण्याबाबत प्रोत्साहित केले जात असून, कायमस्वरूपी व तात्पुरत्या पद्धतींचा अवलंब करण्याबाबत सातत्याने समुपदेशन केले जात असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जळगाव जिल्ह्याचा सध्याचा जनन दर हा 1.72 इतका नोंदवला गेला असून, तो लोकसंख्या स्थिरीकरणाच्या दृष्टीने समाधानकारक मानला जात आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या कुटुंब कल्याण सेवांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या दोन्ही पद्धतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यात महिलांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीय असले, तरी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढवण्यासाठी समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाची व पुरुषांच्या सहभागाची गरज असल्याचे सिईओ करिष्मा नायर यांनी सांगितले.








