Bodwad News: बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात ‘जागतिक सामाजिक न्याय दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश ए. पी. खोलम तर प्रमुख वक्ते म्हणून बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना ॲड. अर्जुन पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली न्यायव्यवस्थेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “छत्रपती शिवरायांची न्यायव्यवस्था ही जगातील पहिली खरी सामाजिक न्यायव्यवस्था होती. त्यांचे स्वराज्य हे जात, धर्म, लिंग, वंश किंवा रंग या भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एका सूत्रात गुंफणारे होते. आज दुभंगलेली मने आणि वैचारिक कटुता यामुळे समाजासमाजात दरी निर्माण झाली आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला सामाजिक न्याय मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक आणि राजकीय न्यायाला अर्थ उरणार नाही”.
समाजात आजही अनेक घटक उपेक्षित आहेत. पीडित आणि शोषितांना वेळेवर न्याय मिळवून देणे हेच सामाजिक न्यायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. न्यायव्यवस्थेसमोर सर्व समान असून, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे हे न्यायव्यवस्थेचे कर्तव्य आहे, असेही ॲड. अर्जुन पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष ॲड. धनराज प्रजापती व ॲड. के. एस. इंगळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. किशोर महाजन यांनी मानले. यावेळी ॲड. के. एस. इंगळे, ॲड. ॲड. अमोल पाटील, ॲड. समीर पिंजारी, ॲड. सी. के. पाटील, उपस्थित होते. तसेच न्यायालयीन प्रशासनाच्यावतीने अधीक्षक वैभव तरटे, प्रशांत कुमार बेदरकर, श्रीराम भट, योगेश वाणी, एस के बेलदार, अविनाश राठोड, यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.










