Bangladesh Cricket Team : बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काही लोकांनी कोलकाता नाईट रायडर्स संघात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला घेतल्याने मालक शाहरुख खान यांच्यावर टीका केली. बीसीसीआयच्या सूचनेनुसार, केकेआरने मुस्तफिजूरला सोडले, ज्यामुळे वाद आणखी वाढला. आता, मेरठमधील क्रिकेट उपकरणे कंपनी बांगलादेशी खेळाडूंसोबतचा करार रद्द करू शकते, असे वृत्त समोर आले असून, यामुळे बांगलादेशला भारतासोबत पंगा घेणे महागात पडले आहे, अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
मुस्तफिजूर रहमानच्या सुटकेनंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपत्कालीन बैठक बोलावली आणि २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतात प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीबीने आयसीसीला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलविण्याची विनंती केली. शिवाय, बांगलादेश सरकारने इंडियन प्रीमियर लीगचे प्रसारण स्थगित केले.
बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा धक्का
वृत्तानुसार, मेरठमधील एक क्रिकेट उपकरणे कंपनी अनेक बांगलादेशी खेळाडूंना प्रायोजित करते, परंतु आता त्यांच्यासोबतचा करार रद्द करण्याचा विचार करत आहे. वृत्तानुसार, लिटन दास देखील त्याच कंपनीच्या बॅटने खेळतो. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये लिटन दास बांगलादेशचा कर्णधार आहे. यासिर रब्बी आणि मोमिनुल हक देखील त्याच कंपनीच्या उपकरणांचा वापर करतात.
कोलकातामध्ये बांगलादेशचे तीन सामने
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये, बांगलादेश इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिजसह ग्रुप सी मध्ये आहे. टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे, पहिल्या दिवशी बांगलादेशचा सामना वेस्ट इंडिजशी आहे.
बांगलादेशचा दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी इटली विरुद्ध आणि त्यांचा तिसरा सामना १४ फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध आहे. बांगलादेशचे सुरुवातीचे तीन सामने कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत. 17 फेब्रुवारीला नेपाळविरुद्धच्या चौथ्या सामन्यासाठी संघ मुंबईला जाणार आहे.









