Prime MInister Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एनडीए संसदीय पक्षाच्या ‘मंगल मिलन’ बैठकीत सांगितले की, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि नीट (NEET) सारख्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटणे ही राष्ट्रीय चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की, प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि या मुद्द्याचे राजकारण केले जाऊ नये.

एनडीएच्या बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना केल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे भविष्य प्रभावित होऊ नये यासाठी नीट फेरपरीक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आणि कोणताही विलंब न लावता निकाल जाहीर करण्यात आले. पंतप्रधानांनी बैठकीत अशीही माहिती दिली की, प्रश्नपत्रिका फुटीची घटना उघडकीस येताच सरकारने तातडीने कारवाई करून १३ जणांना अटक केली. त्यांनी सांगितले की, यात सामील असलेल्यांना तुरुंगात पाठवण्यात आले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.







