Jalgaon News: देशात सर्वाधिक केळी लागवड करणारा जिल्हा अशी जळगावची ओळख आहे. जिल्ह्यात आता नवी तांत्रिक क्रांती घडविण्याची तयारी सुरू झाली आहे. केळी उत्पादनात अव्वल असलेला जळगावा जिल्हा आता निर्यातीच्या स्पर्धेतही मागे राहणार नाही. कारण, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एआयच्या मदतीने ‘निर्यातक्षम केळी उत्पादन प्रात्यक्षिके’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सेस निधीतून ही योजना साकारली जाणार आहे. या उपक्रमातून आता जळगावच्या केळीला जागतीक बाजारपेठ सहज लाभणार आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी 50 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळीची लागवड होते. स्थानिक अर्थव्यवस्थेते केळीचा मोठा भाग आहे. मात्र, निर्यातक्षम दर्जासह ग्रेडिंग, पॅकिंग व तांत्रिक मानकांमध्ये सातत्य नसल्याने जळगाव जिल्हा मागे राहीला आहे. जळगावला जागतिक बाजारपेठेत सक्षमपणे उभे करण्यासाठी ‘एआय’ आधारित प्रिसिजन फार्मिंगचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या संकल्पनेतून ही योजना आकारास आली आहे. या योजनेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा अॅनालिटिक्सच्या साहाय्याने पिक व्यबस्थापन करण्यात येणार आहे. शेतात सेन्सरद्वारे मृदातील आर्द्रता, तापमान, आर्द्रता व हवामानाचा डेटा संकलित केला जाईल. या डेटावर आधारित अचूक सिंचन व खत व्यवस्थापनाचे नियोजन होईल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बारामती आणि जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. निवडक शेतांवर प्रात्यक्षिके राबवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. यामध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, तांत्रिक सल्ला व नियमित फॉलोअप यांचा समावेश असेल. एआय प्रणालीद्वारे तयार होणारे अहवाल शेतकऱ्यांना
मोबाईल अॅप किंवा संदेशाद्वारे उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. या योजनेमुळे उत्पादनातील अनिश्चितता कमी होऊन गुणवत्तेत सुधारणा होईल. निर्यात निकषांनुसार फळांचा आकार, रंग, वजन व साठवण क्षमता सुधारण्यास मदत होईल. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जळगावच्या केळीला अधिक मागणी निर्माण होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. केळी उत्पादनात दर्जात्मक सातत्य आणणे, निर्यात निकषांनुसार उत्पादन प्रक्रिया विकसित करणे, उत्पादन खर्चात बचत करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जोखमीचे व्यवस्थापन, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले, की जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत लोगोमध्ये केळीचा समावेश आहे. यावरून जिल्ह्याची ओळख या पिकाशी किती घट्ट जोडलेली आहे हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर केळी उत्पादनात तांत्रिक आधुनिकीकरण करून जागतिक दर्जा मिळविणे हा जिल्हा परिषदेचा दीर्घकालीन दृष्टीकोन आहे. केळी उत्पादनात जळगाव अग्रेसर आहे. आता या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक बनविण्यासाठी एआय आणि प्रिसिजन फार्मिंगची जोड
योजनेंतर्गत प्रमुख घटक
- स्वयंचलित हवामानावर आधारित सिंचन वेळापत्रक
- मृदा तपासणी अहवालानुसार संतुलित खत व्यवस्थापन
- ठिबक सिंचन व फर्टिगेशन प्रणाली
- उच्च दर्जाच्या टिश्यूकल्चर केळी रोपांची लागवड
- हिरवळीच्या खतांचा वापर करून मृदा सुपीकता वाढविणे
- मल्चिंगद्वारे ओलावा संवर्धन
- बड इंजेक्टर तंत्रज्ञानाद्वारे किड नियंत्रण
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची फर्टिगेशनमधून पूर्तता
- बंच स्प्रे व स्कर्ट बॅगचा वापर करून दर्जा संरक्षण








