Laxmi Mukti Yojana : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना शेतीमध्ये सहहक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे. परंतु, आजही अनेक महिलांना या योजनेबाबत अधिक माहिती नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर आज आपण या योजनेसंदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.
लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत आता महिलांना पतीच्या नावावर असलेल्या सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून स्वतःचे नावही नोंदणी करता येणार आहे. विशेषतः यासाठी कुठलाही खर्च लागणार नाही. ही नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे.
नाव नोंदणी केल्याने काय होईल फायदा?
पतीच्या नावावर असलेल्या सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून स्वतःचे नाव नोंदणी केल्याने कायदेशीर आणि सामाजिक संरक्षण मिळेल. तसेच कृषी कर्ज, सरकारी योजनेचा लाभ आणि बचत गटांद्वारे आर्थिक मदतदेखील मिळेल.
अर्जासाठी ‘हे’ कागदपत्रे अनिवार्य
या योजनेसाठी अर्ज करताना, पती-पत्नीचा संयुक्त अर्ज, सातबारा उतारा व ८-अ उतारा, आधार कार्डाची प्रत, रेशन कार्डाची प्रत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पोलिस पाटील यांच्याकडून अधिकृत पत्नी असल्याचा दाखला अनिवार्य आहे.
कुठे करावा लागणार अर्ज ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावा. तलाठी त्याची चौकशी करून आवश्यक ती प्रक्रिया सुरू करेल.
दरम्यान, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना शेतीमध्ये सहहक्क मिळवून देण्यासाठी ”लक्ष्मी मुक्ती योजना” सुरू केली असून, महिलांना स्वतःचे अस्तित्व, स्वाभिमान आणि सक्षमता सिद्ध करण्याची ही संधी असल्याचे सरकारने म्हटले आहे.










