मुंबई : दावोसमधील गुंतवणूक परिषदेमार्फत महाराष्ट्रात येणार असलेली ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या विविध भागांमध्ये येणार असून विकासाचे विकेंद्रीकरण हा या गुंतवणुकीचा गाभा असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दावोसहून पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकणात १६ टक्के, एमएमआरमध्ये २२, विदर्भात १३ टक्के गुंतवणूक आली आहे. ५० टक्के गुंतवणूक राज्याच्या इतर भागात आली आहे.
जामनेरात उभारणार ‘कोका-कोला प्रकल्प’
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात ५० हजार कोटींची गुंतवणूक होईल. या भरीव गुंतवणुकीपैकी एक महत्त्वाचा आणि चर्चेचा कोका-कोला प्रकल्प जामनेर तालुक्यात साकारणार आहे. मराठवाड्याचे मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर आहे, तिथे ५५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. नागपूर विभाग तसेच विदर्भात २ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक आली असून कोकणात ३ लाख ५० हजार कोटी गुंतवणूक येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
करार परावर्तीत होण्याबाबत काय म्हणाले?
करार परावर्तीत होण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दावोसला २०२५ मध्ये जे गुंतवणूक करार झाले, त्यातील ७५ टक्के प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत. या गुंतवणुकीचा कालावधी तीन ते सात वर्षे असतो. जे करार प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत, त्यामागे जिओ पॉलिटिकल कारणे आहेत.








