Varangaon News: राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत वरणगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष साहित्य वितरण कार्यक्रमात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल व व्हिल चेअर वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवणे आणि समाजातील सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे.
कार्यक्रमात बोलताना मंत्री सावकारे म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही अद्वितीय देणगी असते. चालता येत नसल्यामुळे किंवा शरीरदृष्ट्या अडचणी असल्या तरी दिव्यांग व्यक्तींची बुद्धी, कौशल्ये आणि क्षमता इतरांपेक्षा कमी नाहीत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या साधनांमुळे त्यांचे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सहभाग सुलभ होईल. स्वतःला कधीही कमी समजू नका, संधीचा पूर्ण लाभ घ्या आणि आपल्या कौशल्यांची उंची गाठा.”
कार्यक्रमात स्थानिक अधिकारी, समाजसेवी संस्था आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी भारतीय कृतीम अंग निर्माण निगम (अलिम्को), इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव, आणि एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था वरणगाव यांनी सहकार्य केले.
साहित्य वितरणात व्हीलचेअर 7, बॅटरी सायकल 5, कर्ण मशीन, कुबडी, वाकर, काठी, एल बो क्लच यांसह एकूण 27 लाभार्थ्यांना मदत करण्यात आली. कार्यक्रमामुळे फक्त साहित्य वितरण नव्हे तर समाजात दिव्यांग व्यक्तींविषयी जागरूकता आणि प्रेरणा निर्माण झाली.
सावकारे यांनी सर्वांना संदेश दिला, “देव एखादी गोष्ट कमी देतो, परंतु दुसरीत विशेष शक्ती भरतो. चालता येत नसल्यामुळे तुम्ही कमी नाही. आपल्या बुद्धी, लेखन, वक्तृत्व किंवा इतर कौशल्यांमुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. शासनाचे उपक्रम तुम्हाला स्वावलंबी बनण्याची संधी देतात आणि समाजात तुमची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी जागा निर्माण करतात.
यावेळी जिल्हा दिव्यांग पुर्नवसन आधिकारी एस.पी. गणेशकर, मुकुंद गोसावी, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनरध्यक्ष अरुणा इंगळे, नगरसेविका मनिषा माळी, भाग्यश्री सोनवणे, शामल झांबरे, दिपाली माळी, वैशाली धनगर, वृषाली चौधरी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, मिलींद मेढे, इफ्तेखार मिर्जा, दिव्याग संघटनेचे अध्यक्ष सुनील शेटे आदी मान्यवरांचे एकता दिव्याग बहुउद्देशीय संस्था, वरणगावतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वतेसाठी शेख रफीक शेख सांडू, विजय चौधरी, सुनील पाटील, जिनेंद्र सैतवाल, सुखराम माळी, आर्यन परदेशी, सतोष देशमुख, रामा शिवरामे, भिकारी सोनवणे, संतोष पाटील, विद्या सोनार, सविता भोई यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनवणे यांनी केले तर आभार सुनील शेटे यांनी मानले.








