Mumbai News: महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव व डोंगर कोळी समाजाच्यावतीने सोमवार, 23 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. समाजाचे कार्यकर्ते दत्तात्रेय सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. ‘कोळी’ नोंदीवरून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
सुमारे 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाने गांभीयनि लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनस्थळी राज्याचे अभ्यासक व संघटक शुभम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना 2014 साली विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्या वेळी ‘देता की जाता’ असे म्हणत कोळी समाजाचे दाखले देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे सोनवणे यांनी सांगितले. सत्तेवर आल्यानंतर अन्याय दूर करू, असा शब्द देण्यात आला होता. मात्र 12 वर्षांनंतरही कोळी समाजाला न्याय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनस्थळी फडणवीस यांच्या 2014 मधील भाषणाचे ध्वनिमुद्रण ऐकवून मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दाला जागावे, असे आवाहन करण्यात आले. ‘मुख्यमंत्र्यांना कोळी समाजाच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे. त्यामुळे त्यांनी अधिक विलंब न लावता आदिवासी कोळी जमातींना त्यांच्या हक्काचा न्याय द्यावा’, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. उपोषणस्थळी राज्यभरातून हजारो समाजबांधव व अभ्यासक उपस्थित होते. आंदोलन पुढील निर्णयापर्यंत सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.










