Varangaon News: शहरातील शासकीय जागांवर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांवर नगरपालिकेने अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. थकीत भाडे तात्काळ भरणे आणि मुदत संपलेल्या जागा रिकाम्या करण्याचे आदेश देत सुमारे ३०० व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत कार्यकाळात शहरात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलांतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र, कालांतराने अनेक करारांची मुदत संपूनही गाळेधारकांनी जागा कायम ठेवली असून मोठ्या प्रमाणात भाडे थकीत राहिल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर नव्या नियमांनुसार या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकापासून भोगावती नदीपर्यंतच्या प्रमुख मार्गालगत असलेल्या दुकानांवर या कारवाईचा विशेष फोकस असून, शहरातील प्रमुख व्यापारी पट्टा यामध्ये येत आहे. पालिकेकडून देण्यात आलेल्या नोटिशीनुसार, संबंधित गाळेधारकांनी नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत थकीत रक्कम भरून जागा रिकामी करणे बंधनकारक आहे. आदेशाचे पालन न केल्यास पालिका थेट कारवाई करून गाळे ताब्यात घेणार असून, त्या कारवाईचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
या निर्णयामुळे शहरातील व्यापारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. व्यापारी संघटनेने याला जोरदार विरोध दर्शवत हा केवळ ३०० गाळेधारकांचा प्रश्न नसून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.“अचानक अशा प्रकारे नोटिसा देऊन जागा रिकामी करण्यास सांगणे अन्यायकारक आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्यावसायिक आधीच अडचणीत आहेत. आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे संघटनेचे अध्यक्ष विलास मुळे यांनी सांगितले.
पालिकेची भूमिका ठाम…
दरम्यान, पालिका प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ग्रामपंचायत काळात करण्यात आलेल्या करारांची मुदत संपली असून अनेकांकडून भाडे थकीत आहे. त्यामुळे नियमांनुसार वसुली व नूतनीकरणासाठी नोटिसा देणे आवश्यक होते,” असे उपमुख्य अधिकारी रशीद नौरंगाबादी यांनी सांगितले.







