Bhusaval News: मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील आसवली- पाडळी सेक्शनवरील कायमस्वरूपी वेगमर्यादा हटवली आहे. त्यामुळे सुरक्षित आणि वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना मिळणार आहे. एका महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये भुसावळ विभागाने आसवली–पाडळी विभागातील मुंबईला जाणा-या ‘अप’ मार्गावर अत्यंत आव्हानात्मक असे ‘थ्रू फॉर्मेशन ट्रीटमेंट’ (टीएफटीआर) काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. १६०.५७० किमी. ते १६०.१३७ किमी. या अंतरादरम्यानच्या ८०० मीटर लांबीच्या पट्ट्यावर ब-याच कालावधीपासून रेल्वे गाड्यांवर ७५ किमी प्रति तास वेगमर्यादा (पीएसआर) लागू होती; ज्यावर, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत, सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक होते
हे काम पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक होते, कारण हा विभाग निम-घाट क्षेत्रात स्थित असून तिथे पोहोचणे मर्यादित स्वरूपाचे आहे. येथील रेल्वे रुळांच्या फॉर्मेशनची (पायाची) उंची अंदाजे ९ मीटर असून, त्यात २.२६ अंशांचा एक वळणदार भाग देखील समाविष्ट आहे. या सर्व मर्यादांचा विचार करून, हे काम २०२५ च्या पावसाळ्यानंतरच्या काळात पूर्ण करण्याचे धोरणात्मक नियोजन करण्यात आले होते.
टीएफटीआरचे काम ‘कट अँड कव्हर’ पद्धतीचा वापर करून पार पाडण्यात आले; यासाठी ४ उत्खनन यंत्रे, २ जेसीबी, ३ हायड्रा क्रेन, १ व्हायब्रेटरी रोलर आणि पाण्याच्या टँकर्सचा वापर करण्यात आला. ही संपूर्ण मोहीम ३३ ‘ट्रॅफिक ब्लॉक्स’मध्ये पूर्ण करण्यात आली, ज्यातील प्रत्येक ब्लॉकचा सरासरी कालावधी २ तास ३० मिनिटे इतका होता. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंत्यांच्या पथकाने, तसेच १० विभागीय कर्मचारी आणि २५ कंत्राटी कामगारांसह एकूण ३५ जणांनी हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
टीएफटीआरचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे, ७५ किमी प्रति तास वेगमर्यादेचे कायमस्वरूपी निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. या घडामोडीमुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होईल आणि या विभागातील रेल्वे संचलनाची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढेल. मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सुरक्षितता वाढवणे आणि रेल्वेचा वेग वाढवणे या उद्देशाने पायाभूत सुविधांचे निरंतर आधुनिकीकरण करण्यावर मध्य रेल्वेचा भर राहिला आहे.







