Bhusaval News: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात उत्साह असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिस्त आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत आहे. मिरवणूक शांततेत आणि वेळेचे काटेकोर पालन करून पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.“मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच समाप्त करणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’
दरम्यान, जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत आदेश जारी केले असून त्या दिवशी सर्व प्रकारची मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.बैठकीत सुमारे ७० ते ७५ पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावरील खड्डे, पथदिवे आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या मांडण्यात आल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले.
सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांवर भर देण्यात आला आहे, यंदाच्या मिरवणुकीत केवळ ध्वनीप्रदूषण न करता डॉ.आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देणारे सामाजिक देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपद्रवींवर करडी नजर
शहरात सीसीटीव्ही(CCTV) आणि गुप्त माहितीच्या माध्यमातून पोलिस सतत नजर ठेवणार आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरुद्धही कठोर कारवाई केली जाणार आहे. शांतता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शहरातील सलोखा, शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.








