Maharashtra Onion Crisis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत कांदा प्रश्नावर येत्या 10 दिवसात तोडगा निघणार असे संकेत दिले आहे.
या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदारी, कांदा उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकरी यांच्याबाबत काय काय चर्चा झाली, केंद्र सरकारकडून काय मागण्या मागण्यात आल्या आणि केंद्र सरकारने काय मागण्या मान्य केल्या? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने पुढच्या १० दिवसांत काही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, ते निर्णय नेमके काय आहेत ते फडणवीसांनी सांगितलं आहे.
महाविकास आघाडीकडून तसेच इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात सत्ताधाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन केले होते. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) नाशिक येथे रस्ता जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला होता. बैठकीत झालेल्या चर्चेविषयी सांगताना फडणवीस म्हणाले, साखर उद्योग आणि कांद्याच्या प्रश्नावर आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात अतिशय सकारात्मक बैठक पार पडली. कांद्याचा आणि साखर
उद्योगात शेतकरी अत्यंत कठीण प्रश्नांना तोंड देत होते. त्याबाबत नक्कीच साधकबाधक चर्चा झाली. आम्हाला 10 दिवसांत सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन मिळाले आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आणि साखर उद्योगाला दिलासा देणारी घटना आज घडलेली आहे. आम्ही अत्यंत समाधानी
आहोत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत अत्यंत चांगली चर्चा झाली. मी भारत सरकारचे मनापासून आभार मानतो. आता सध्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?
बैठकीबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, या बैठकीत कांदा प्रश्नावर मोठा तोडगा निघेल, अशी आशा राज्यातील शेतकऱ्यांना होती. त्यानुसार या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही. तशी बंदी असेल तर उद्यापर्यंत ती बंदी उठवू, असे आश्वानस अमित शाह यांनी दिले आहे.









