Jalgaon News: विदर्भ सोडला तर हळूहळू तापमान कमी हो असून सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे आणि १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवारी महाराष्ट्रतील जळगाव ७४, कळवण- नाशिक ४६ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे, मध्य महाराष्ट्रात दि. १, ३ आणि ४ जून रोजी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज दिल्ली हवामान केंद्राने वर्तविला आहे. वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काही दिवस पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसाने केळी पिकाचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.
कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही, असे शासनाने कळविले आहे.

कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









