Nashik News: जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिकच्या पंचवटीतील नाट्यगृहात ‘पर्यावरणसमृद्ध नाशिक व हरित कुंभाच्या दिशेने लोकसहभाग’ या विषयावर विशेष सभा झाली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी डॉ.सिंह यांनी संवाद साधला. काँक्रिटीकरण हा कंत्राटदार आणि राजकारण्यांचा मोठा खेळ असतो. काँक्रिटीकरणाचे काम करणे सोपे असते. त्यामुळे हे सर्व लोक त्याच कामात गुंतलेले आहेत, अशी टीका डॉ. सिंग यांनी केली आहे.
नदी मृतप्राय होतेय
नदीचे काँक्रिटीकरण केले की नदी मृतप्राय होते. त्यामुळे आपण आंदोलनाचा इशारा दिला होता. पण पुढील काळात जागतिक दुष्काळ आणि पूर आयोगाच्या कामात आपण व्यस्त झाल्याने नाशिकला येणे झाले. तरी, ही बाब पालकमंत्री आणि संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले
७ नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याची गरज
गोदावरीला काँक्रिटीकरणातून मुक्त करण्यासाठी १७ नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याची गरज त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. गोदावरीला प्रवाही ठेवण्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. पहिल्या टप्प्यात पाच कुंडांपैकी केवळ अनामिक आणि दशाश्वमेध कुंड याचे काम झाले, उर्वरित रामगया, खंडोबा आणि पेशवे कुंडातील काम अर्धवट आहे.

१० कुंडे काँक्रिटमुक्त करणे आवश्यक
गोदापात्रा असलेल्या काँक्रिटीकरणामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पूरस्थितीचा धोका निर्माण होतो, यावर तज्ज्ञांनी अनेकदा बोट ठेवले आहे. सिंहस्थाच्या दृष्टीने रामकाल पथ प्रकल्पांतर्गत गोदावरी काठावर काँक्रिटीकरणाची अनेक कामे केली जाणार आहे. मात्र, निरीने निळ्या पूररेषेत कोणतेही काम करू नये, अशी सूचना केली आहे. तरीही गोदावरी नदीत सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात काँक्रिटचा भराव टाकण्यात येत आहे. रामकुंडासह उर्वरित १० कुंडे काँक्रिटमुक्त करणे आवश्यक असून मात्र, तसे होताना दिसत नाही, अशी खंत ही सिंह यांनी व्यक्त केली.









