Assam Flood: आसाममधील पूरस्थितीचा फटका अनेक गावांना बसला आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने यावर्षी पुरामुळे मृतांची संख्या ८० झाली आहे. यामध्ये पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचा ही समावेश आहे.आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २,१२,४०० लोकांना पुराचा फटका बसले असून ४३७ गावे पाण्याखाली गेली आहेत. आसाममधील पूरस्थिती हळूहळू सुधारत आहे, परंतु हे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही, तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
२१ महसूल विभाग प्रभावित
या पुराचा सर्वात मोठा परिणाम चरईदेव जिल्ह्यात झाला असून तेथे सुमारे ८० हजार लोक बाधित झाले आहेत. शिवसागरमधील सुमारे ७१ हजार आणि जोरहाटमधील ४० हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील २१ महसूल विभागही प्रभावित झाले आहेत.चार जिल्ह्यांमध्ये ११२ मदत शिबिरे आणि मदत वितरण केंद्रे कार्यरत आहेत, जिथे ७५,५८३ विस्थापित लोकांनी आश्रय घेतला आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन विभाग, पोलीस आणि प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

१७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान
पुरामुळे १७,१९८ हेक्टरपेक्षा जास्त पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. रस्ते, पूल आणि बंधाऱ्यांसह सार्वजनिक पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. नुमालीगडमध्ये धनसिरी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. सुमारे २.९७ लाख जनावरे आणि कोंबडी यांनाही पुराचा फटका बसला आहे. गेल्या २४ तासात ९१८ क्विंटल तांदूळ, २०३ क्विंटल डाळ, १४६ क्विंटल मीठ आणि १७,५४६ लिटर मोहरीचे तेल बाधित कुटुंबांना वाटप करण्यात आले.
बाधित कुटुंबांना १५ हजाराची मदत
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी मदत आणि पुनर्वसनासाठी अनेक घोषणा केल्या. पूरग्रस्त कुटुंबांना २ आणि ३ ऑगस्टपासून १५,००० रुपयांची तात्काळ आर्थिक मदत दिली जाईल. चरईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये ७ ऑगस्टपासून सर्वंकष नुकसानीचे पंचनामे सुरू होईल, जे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पूरग्रस्त भागातील कर्जदारांना सहा महिन्यांसाठी कर्जाचे हप्ते भरून दिलासा दिला जाईल. आवश्यकतेनुसार कर्जाचा कालावधी सात वर्षांपर्यंत वाढवण्यासही परवानगी दिली जाईल. राज्य सरकारने केंद्राकडे विशेष आर्थिक सहाय्य पॅकेजची मागणी केली आहे.
शाळा सुरू करण्याची तयारी
शाळांच्या पुनर्स्थापनेसाठी सरकारने आठ कोटी रुपये दिले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पाठवली आहेत. पूर आणि चिखलामुळे बाधित झालेल्या प्रत्येक शाळेला साफसफाई आणि दुरुस्तीसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातील. परिस्थिती सामान्य राहिल्यास, ९ ऑगस्टपासून चार बाधित जिल्ह्यांमध्ये वर्ग सुरू होणार आहेत. त्याचवेळी, चरईदेव आणि शिवसागरसाठी रस्ते आणि इतर खराब झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्स्थापनेसाठी विशेष विकास पॅकेज तयार केले जाईल.










