Mumbai News: नाशिक आणि रायगड या दोन प्रमुख जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार राजकीय रस्सीखेच होती. गेल्या दोन वर्षांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम होता. त्यामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावर मार्ग काढला आहे. शासकीय परिपत्रकाद्वारे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणे या दोन्ही ठिकाणी त्या त्या पक्षाच्या नेत्यांना संधी देण्यात अली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांकडून आपला दावा पक्का केला होता. परंतु अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्याचा कारभार आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता. आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन शासनाने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदी स्थनिक मंत्री द्यावा, अशी नाशिककरांची इच्छा होती. त्यासाठी नाशिकचेच आणखी एक मंत्री छगन भुजबळ यांना ते मिळावे यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती. मात्र, यापूर्वी कुंभमेळा यशस्वी पार पाडणारे आणि कुंभमेळ्याचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. राजकीय आणि अध्यात्मिक दृष्टया नाशिक महत्त्वाचे असल्याने भाजपने नाशिकचे पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवल्याचे दिसून येत आहे.
मंत्री भरत गोगावले यांना संधी
तसेच रायगडाच्या पालकमंत्री पदी अखेर अखेर भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे तर नाशिकची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्याकडे सोपान्यात आल्याने या दोनही मंत्र्यांची पालकमंत्री म्हणून त्या त्या जिल्ह्यात नियुक्ती होणार हे स्पष्ट झाले होते. शासनाकडून त्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक जाहीर झाल्याने त्याला अधिकृत दुजोरा मिळाला.
तिढा सुटला
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा विषय रखडला होता.











