Nashik News: नाशिकमध्ये खड्ड्यांवरून वातावरण तापले असून नगरसेवक रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या आवारात दाखल झाले. डोक्याला पट्टी , गळ्यात हात बांधलेला, अंगात ‘नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला’ असे पोस्टर परिधान करून प्रतीकात्मक आंदोलन केले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिककरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा संदेश देऊन आंदोलन केले. आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे हाल नगरसेवकांनी मांडले. आज आयोजित महासभेत शहरातील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. खड्ड्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी काही नगरसेवकानी ही प्रशासनाला जाब विचारला, यावेळी महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली. विरोधकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, एमएनजीएलकडून खोदण्यात आलेले रस्ते आणि विविध विकास कामे सुरू असल्याने शहरातीळ रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची रखडलेली कामे आणि एमएनजीएलकडून खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नाशिक मनपाची विशेष महासभा आज वादळी ठरली. महासभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण चांगलेच तापले. खड्ड्यांच्या प्रश्नाकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून जाब विचारला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी हाताला आणि डोक्याला बँडेज बांधले होते, काही नगरसेवकांनी व्हीलचेअरवर बसून महापालिकेत प्रवेश केला. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देखील रुग्णवाहिकेतून मनपात दाखल झाले. नगरसेवकांच्या या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिकाचे अपघात होत असून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरसेवकांनी संदेश देत प्रशासनाचा निषेध नोंदवला. रस्ते अपघातांमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी झाल्याने या प्रश्नावर तातडीने विशेष महासभा बोलावण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्याप्रमाणे आज विशेष सभा झाली. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होऊन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले.

अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे हे महासभेत बोलत असताना ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून आंदोलन करण्यात आले. शहाणे यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाची कामे आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात यासाठी जबाबदार ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केली. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांनी केली. यावेळी मनपा प्रशासनाने तात्काळ रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी केली. तसेच येत्या आठ ते दहा दिवसांत महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून देण्यात आला. त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.









