Jalgaon News: जळगाव जिल्हा या हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. जन्मदाताच पोटच्या मुलांचा वैरी ठरला, चोपडा तालुक्यातील वडती गावात बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर झोपेतच कुऱ्हाडीने सपासप घाव घालून अत्यंत निर्दयीपाने हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) हा जंगलाच्या दिशेने पसार झाला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि लागलीच तपासाची चक्रे फिरवली, पोलिसांचे पथक आरोपीचा घेत जंगल परिसरात गेले याठिकाणी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान या हृदयद्रावक घटनेत मीरा सुभाष भिलाला (वय १३) या मुलीचा मृत्यू झाला असून, तर. रामू सुभाष भिलाला (वय ११) असे मुलाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे.रामूची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मानेवर व शरीरावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मीरा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान या दुहेरी हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप सावर आलेले नाही. आरोपीला मद्यपानाचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली आहे.
पोलीस याचा सर्व अंगानी तपास करीत आहेत. पोलीस चौकशीनंतरच हल्ल्यामागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान आरोपीला तीन मुले आणि तीन मुली असून दोन मुले आणि मुलींचे लग्न झाले आहे. आरोपीची पत्नी ही जळगावच्या शिवाजी नगर येथे दूध फेडरेशन परिसरात राहायला असून आरोपी हा घर दुरुस्ती करण्यासाठी वडती येथे दोन मुलांना घेऊन तीन दिवसापूर्वी आला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली.








