Nashik News: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग, नाशिक शाखेच्या वतीने ‘सिंहस्थातून संधी – गाव तिथे उद्योजक’ या विषयावर विशेष संवाद आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी हॉटेल ताजच्या द ग्रॅण्ड बॉलरुममध्ये उत्साहात पार पडला.
‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना उत्तम: झिरवाळ
मुख्य अतिथी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी चेंबर कार्याचा गौरव करून नाशिक जिल्ह्य़ात खास आदिवासी उद्योजक क्लस्टर उभारत असल्याची माहिती दिली. त्या कार्यात महराष्ट्र चेंबरने आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. येथील आदिवासीबहुल भागातील व्यक्तींस खास करुन बाजारात विक्री कशी करावी त्याचे कौशल्य शिकवले तर त्यातून एकूणच विकासास चालना मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. गाव तिथे उद्योजक ही संकल्पना उत्तम असून निश्चितच त्यातून गावांचा विकास होईल गावातील तरुणांना रोजगार मिळेल असे सांगून गाव तिथे उद्योजक नव्हे तर पाडा तिथे उद्योजक तयार करावे त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. तसेच अन्न व औषध प्रशासन संदर्भात असलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल. व्यापारी, उद्योजकांना त्रास होणार नाही असे त्यांनी सांगितले.
नाशकात उद्योगसह पर्यटनाला संधी: माणगावे
गाव तिथे उद्योजक ही कवि कल्पना नसून त्याला प्रत्यक्ष जीवनाभुवाची पार्श्वभूमी आहे असे स्पष्ट करून चेंबर अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी समारोप भाषणातून त्याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योजकीय क्रांती क्षमता असलेली ही चळवळ नाशिक विभागात रुजेल व फुलेल असे ते म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या उद्योग-व्यापारासह धार्मिक पर्यटनाला मोठी संधी आहे. संधी ओळखण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि त्यानंतर कृती आवश्यक आहे. सिंहस्था निमित्ताने कोणत्या गरजा आहेत व त्यात काय करावे लागेल हे लक्षात घेऊन नियोजन करावे असे त्यांनी सुचवले.
उद्योजक हा अर्थ व्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक असून महाराष्ट्र चेंबर हे कार्य संपूर्ण राज्यात पुढे घेऊन जात आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. या कार्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले व ग्रामीण भागावर विशेष लक्ष द्यावे आणि तेथील तरुण पिढीस यात सहभागी करुन घ्यावे असे सुचवले.
गाव तिथे उद्योजक ही चळवळ महत्त्वपूर्ण: आ.फरांदे
अतिथी विशेष आमदार देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्र चेंबर सतत शंभर वर्ष कार्य करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गाव तिथे उद्योजक ही चळवळ विशेष महत्वाची असून महिलांसाठी दर आठवड्यात एकदा उद्योजकता प्रशिक्षण चेंबरने आयोजित करावे असे सुचवले. खास करून त्यांच्या उत्पादनांस बाजार पेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे सुचवले.
स्वागताध्यक्ष अजित सुराणा यांनी स्वागत करतांना शेतकरी वर्गात उद्योजक वृत्ती सुप्त असते ती फुलवावी लागेल. त्यासाठी त्यांच्या बाजार पेठ व रास्त भाव मिळण्याच्या समस्या सोडवाव्या लागतील याकडे लक्ष वेधले.
प्रास्ताविक भाषणातून चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी चेंबरच्या नाशिक विभागीय कार्यालयातून झालेल्या कार्याचा आढावा घेऊन खाद्य तेल उत्पादक, व्यापारी, वितरक यांच्या महत्वाच्या समस्येवर माहिती दिली. प्रत्पेक वेळी तेलाचा नवाच डबा वापरायचा असा नियम आहे. व्यवहारात ते शक्य नाही कारण जेवढे डबे लागतील तेवढे डबे देशात उत्पादन होत नाही. त्यामुळे ही व्यवहारात येणारी समस्या सोडवण्यासाठी सवलत द्यावी आणि डबे स्वच्छ करुन पुनर्-वापरास परवानगी द्यावी असे सुचवले. नामदार झिरवळ यांनी या प्रश्नात लक्ष घालून दिलासा द्यावा असे सुचवले.
चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी चेंबरच्या कार्यात नाशिक विभागाचे मौलिक योगदान असून सिंहस्थ काळात पर्यटन संधी खूप आहेत. त्यासाठी गाव तेथे उद्योजक यांस सर्वांनी प्रयत्न करावेत असे सुचवले. देशाचा जागतिक व्यापारात अवघा दीड टक्के इतका कमी हिस्सा आहे याकडे लक्ष वेधून त्यांनी कृषी माल, इंजिनिअर वस्तू यांस निर्यातीसाठी नाशिककरांस मोठी संधी असल्याचे निदर्शनास आणून दिले.
चेंबर ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन गाव तिथे उद्योजक ही संकल्पनाच क्रांतीनंतर असून महाराष्ट्र शासनानेही ती स्वीकारली असल्याची माहिती दिली. चेंबरच्या सर्व कार्यकारी सभासदांनी या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी सहकार्य करा: फाल्गुने
ग्रामीण भाग आणि उद्योग यांच्यातील दरी दूर करण्यासाठी मार्गदर्शन, इन्क्युबेशन सेंटर आणि सरकारी कार्यालयांमधील अडचणी दूर करण्याची गरजही आहे महाराष्ट्र चेंबर त्यासाठी काम करत आहे इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व खासदार राजाभाऊ वाजे यांनी सहकार्य करावे अशी मागणी उपाध्यक्षा सुनिता फाल्गुने यांनी करून त्यांना निवेदन दिले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नूतन कार्यकारणी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे (MACCIA) अध्यक्ष रविंद्र माणगावे, विशेष अतिथी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सौ. देवयानी फरांदे (नाशिक मध्य), ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, आयपीपी संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्ष सुनिता फाल्गुने, उत्तर महाराष्ट्र विभाग २ चे उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल,मुंबई विभाग १ च्या उपाध्यक्ष डॉ. धनश्री हरदास, स्वागताध्यक्ष अजित सुराणा, निमंत्रित सदस्य वेदांशू पाटील, माजी अध्यक्ष हेमंत राठी उपस्थित उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, माजी उपाध्यक्ष रमेश पवार, संजय सोनवणे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार नाशिक धान्य घाऊक किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल संचेती नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेचे अध्यक्ष संतोष राय,सीएचए असोसिएशनचे अध्यक्ष सी.एस. सिंग, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शर्मा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी, तेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पटेल, द्राक्ष उत्पादक निर्यातदार संघटनेचे विलास धुरजड आदींसह विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र चेंबरचे सदस्य व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारणी सदस्यांनी परिश्रम घेतले.








