Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात काही व्यक्ती पत्रकार असल्याचे भासवून शासकीय कार्यालये, सार्बजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, उद्योजक व अवैध धंदे धारक यांच्याकडून खोटे ओळखपत्र दाखवून पैसे उकळत असल्याच्या तकारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. अशा बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जळगावचे पोलीस अधीक्षक यांना ही कारवाईचे निवेदन देण्यात आले आहे. पत्रकारानी दिलेल्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बनावट पत्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
जिल्हाधिकारी घुगे म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट पत्रकार मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात, अशा चुकीची माहिती पसरवणाऱ्या तोतया पत्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तथाकथित ‘तोतया पत्रकार’ कोणत्याही मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेचे सदस्य नसून, त्यांच्याकडे अधिकृत मान्यता, नियुक्तीपत्र किंवा वैध ओळखपत्र नसतानाही पत्रकारितेचा धाक दाखवून धमक्या देतात व पैशाची मागणी करतात. यामुळे खऱ्या पत्रकारांचे नाव बदनाम होत असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. असे संघटनेने निवेदनात नमूद केले.

त्यामुळे अशा बोगस पत्रकारांवर भारतीय दंड संहिता तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा व्यक्तींची यादी तयार करून त्यांच्यावर देखरेख ठेवावी. या गंभीर विषयाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही कराल, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी नरेंद्र कदम, सागरभाऊ ओतारी, चेतन वाणी, जाकीर रहेमान, योगेश सुने, प्रवीण पाटील, हेमंत पाटील, रशीद बागवान, जितेंद्र कोतवाल, आकाश बाविस्कर आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.








