Nepal Floods Update: नेपाळ मधील महाभयंकर पुरात वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा आता १७७ वर पोहोचला आहे. अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. तर, ४४७ लोक अद्यापही बेपत्ता आहे. त्यात १७८ भारतीय भारतीय नागरिकांचा समावेश आहे. असे वृत्त एनएनआय संस्थेने दिले आहे. दरम्यान नेपाळ पोलिसांनी मृतांच्या संख्येबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत १७७ मृतदेह सापडले आहेत. या आपत्तीतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भोटेकोशी आणि त्रिशुली नदीप्रणालीच्या काठावरील रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन, गोरखा, तनहुन, नवलपरासी (पूर्व) आणि नवलपरासी (पश्चिम) या जिल्ह्यांमधून मृतदेह सापडले आहेत. बहुतेक मृतदेह नेपाळच्या दक्षिणेकडील मैदानी प्रदेशातील चितवनमधून सापडले आहेत.
२१ भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढले
दरम्यान सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराने गुरुवारी सकाळी बचावकार्य सुरू केले आणि पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक असलेल्या तिमुरेमधून ९५ नेपाळी नागरिक आणि २१ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
विदेशमंत्री खनाल म्हणाले
काठमांडू येथे ‘अन्विक्षा’ संवादादरम्यान एनडीटीव्ही न्यूज नेटवर्कशी बोलताना नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल म्हणाले की, विध्वंसाचा परिणाम प्रचंड होता आणि सरकार अजूनही या दुर्घटनेची तीव्रता जाणून घेत आहे.
राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRRMA) माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ८२६ लोकांशी संपर्क होऊ शकला नाही. यापैकी ५७९ पर्यटक होते, मात्र ते परदेशी पर्यटक होते, देशांतर्गत पर्यटक होते की दोन्ही, हे प्राधिकरणाने स्पष्ट केले नाही.

त्याचप्रमाणे, रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये नेपाळी लष्कराचे ४८ जवान, नेपाळ पोलिसांचे २८ जवान, सशस्त्र पोलीस दलाचे (APF) १३ जवान आणि इतर १६२ जणांशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सांगितले की, पंतप्रधान शाह यांनी आपत्तीग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सकाळी नुवाकोट जिल्ह्यातील पूरग्रस्त बिदूर नगरपालिकेत आगमन केले.
या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री पुरामुळे झालेल्या भौतिक नुकसानीचा आढावा घेतील आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत मदत, पुनर्वसन आणि विस्कळीत झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्स्थापनेवर चर्चा करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) म्हटले आहे की, सर्व पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहोचवण्यास आणि नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीस गती देण्यासाठी आवश्यक निर्देश जारी केले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : 1070 (टोल-फ्री क्रमांक)
नियंत्रण कक्ष : +91-9321587143
अधिकृत ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in
महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन केले आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









