Latest Weather News: जळगावमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सोडल्या तर, दमदार पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. गेले तीन दिवस ग्रीन अलर्ट होता. याठिकाणी हलक्या सरी पडणार, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र उद्या सोमवारी जळगावला येलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी सकाळपासून ऊन सावलीचा खेळ सुरू होता, दुपारी तर चक्क कडक ऊन पडले होते. त्यामुळे पावसाची चिन्हे दूरदूर पर्यंत दिसत नव्हते,काही काळ ढगाळ हवामान होते. मात्र, ऊन देखील पडले. एकंदरीत पाऊस आणखी लांबला तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावू शकते. हवामान खात्याने जळगावला दि.२७ ते २९ असे तीन दिवस मुसळधार (येलो अलर्ट) पावसाचा इशारा दिला आहे.
नाशिकला पावसाने अनेक कुटुंबे बेघर
धुळे, नंदुरबार व नाशिकला ग्रीन अलर्ट आहे. याठिकाणी हलका पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. गेले दोन ते तीन दिवस नाशकात धुवाँधार पाऊस झाला आहे. नाशिक जिल्हातील जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. ज्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेड्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आलीय. तर चांदोरीत तब्बल ४०० कुटुंबांचे तर सायखेड्यात २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदोरीत या पुरामुळे तब्बल १०० तर सायखेड्यात १०० हून अधिक दुकानांमधील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान पावसाने आतापर्यंत सातशे कुटुंबे बेघर झाली आहे. यावेळी पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार यांनी थेट ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. यानंतर सर्व विभाग प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
आ. देवयानी फरांदे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
दरम्यान नाशिकच्या घाटमाथा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे गोदावरी लगतचा बहुतेक भागात पाने शिरले. याच दरम्यान गोदावरीला पूर आला. नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने ते नंदुरमाध्यमेश्वर आणी पुढे जायकवाडीकडे सरकले. दरम्यान नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे नेमके किती पाणी सोडण्यात आले? जून महिन्यात जायकवाडीतील पाणीसाठा किती होता? आणि या विसर्गावर नियंत्रण नेमके कोणाचे आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नाशिककरांच्या हक्काच्या पाण्याबाबत माहिती लपवली जात असल्याचा आरोप ही आ. देवयानी फरांदे यांनी केला.








