Nashik News: पावसाचे आगमन होताच, शहरात डेंग्यूचा उद्रेक पहायला मिळत असून, जुलैच्या तीन आठवड्यात २२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या संशयितांचा आकडा २६० पर्यंत गेला आहे. त्यामुळे डेंग्यूबाधित रुग्णांचा आकडा आता ४५ वर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे डेंग्यूसह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असताना धूरफवारणी मात्र कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात चिकनगुनियाचेही २ रुग्ण आढळून आले आहे. शहरात दरवर्षी पावसाळा आला की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. एडिस एजिप्ती नावाचे मादी डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या डासांचा प्रादुर्भाव स्वच्छ पाण्यात होतो. यंदाही नाशिकककरांना डेंग्यूचा डंख लागला आहे. घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूस कारणीभूत ठरणार्या डासांची पैदास झाल्याने नाशिककरांना डेंग्यूची लागण झाली आहे.

दरम्यान जुलै महिन्यात पावसाळा सुरू होताच जुलैच्या गेल्या २१ दिवसांतच डेंग्यू सदृश आजाराचे २३८ रुग्ण आढळले आले. प्रयोगशाळेतील रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती २२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत डेंग्युचा दररोज एक नवा रुग्ण आढळत आहे, तर डेंग्यू पाठोपाठ नाशिकला चिकनगुनियाचीदेखील लागण झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत चिकनगुनियाचे दोन रुग्ण आढळून आले असून, जानेवारीपासून पाच रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत चिकनगुनियाचे ६२४ संशयित निष्पन्न झाले आहेत.
एकूणच तापसदृश आजाराच्या रुग्णांचा आकडा ही मोठा असून, त्यांची नोंद मात्र होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच, शहरात साथीच्या आजारांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे महापालिकेकडून होणारी धूर फवारणी मात्र कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार्या डेंग्यू रुग्णांची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी रुग्णालये ही माहिती कळवित नाहीत. त्यामुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही.
आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंद असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाचं आगम होताच ओलाव्याला धरून येणार्या मच्छारांची संख्या देखील चांगलीच बळावल्याने त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.नाशिकमध्ये डेंग्यूची लागण ही गेले सहा महिने काही प्रमाणात चालू आहे. जानेवारीमध्ये ६ रूग्ण, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २ ,एप्रिलमध्ये १, मे ३, जूनमध्ये ८, तर पावसामुळे जुलैमध्ये हा आकडा २२ वर गेला आहे.










