Jalgaon News: अल निनोचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. पावसाने उघडीप दिली आहे. त्यातच अधून-मधून बरसणाऱ्या रिमझिम पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात किंचित वाढ दर्शविली आहे. जळगाव आणि भुसावळकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसला तरी तुरळक पडणाऱ्या सरींमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणी पातळीत गेल्या १५ दिवसात १४.७४ टक्के वाढ झाली आहे. तर हतनूर धरणाची पाणी पातळी १५.१५ टक्क्याने वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे. त्यामुळे जळगाव आणि काही प्रमाणात भुसावळचा पिण्याच्या पाण्याचे संकट टळले असून अल निनोच्या धास्तीने पाणी टंचाईच्या संभाव्य भीती दूर झाली आहे. तरी पावसाची उघडीप बघता पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिकांसाठी जोरदार पावसाची गरज आहे.
जळगाव शहराच्या दृष्टीने वाघूर (Waghur) धरणाच्या जलसाठ्यातील वाढ समाधानकारक दिसून येत आहे. एकंदरीत १४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान १५ दिवसात जळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाघूर आणि भुसावळकरांसाठी हतनूर धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १४ ऑगस्ट रोजी वाघूर धरणात ६०. ५१ टक्के जलसाठा होता. तर हतनूरमध्ये ५१.०६ टक्के होता. तसेच आता १ सप्टेंबर २०२६ रोजी वाघूर धरणात ७५.२५ तर हतनूरमध्ये ६६. १२ टक्के जलसाठा आहे. त्यामध्ये १५ दिवसात वाघूर जलसाठा हा १४. ७४ तर हतनूरचा पाणीसाठा हा १५.१५ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे.

१ सप्टेंबर पर्यंत वाघूरमध्ये आजचा उपयुक्त जलसाठा १८६ (द.ल.घ.मी.) इतका आहे. तर एकूण साठा २६३.५७ (द.ल.घ.मी.) आहे. हतनूर धरणात आजचा एकूण उपयुक्तसाठा हा ३०१.६० (द.ल.घ.मी) असून आजचा उपयुक्तसाठा १६८ (द.ल.घ.मी) आहे. वाघूर आणि हतनूरच्या जलसाठ्यात अनुक्रमे १४.७४ टक्के आणि १५.१५ टक्के झालेली वाढ महत्त्वाची असून जळगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. असे असले तरी शेतीसाठी पावसाची गरज कायम आहे.









