Chopda News: नागरिकांना सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारांनी धानोरा येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अवघ्या दोन दिवसांत तब्बल 1 लाख 96 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आता सायबर ठग ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांना देखील लक्ष करत आहेत.
दरम्यान फसवणूक झालेल्या शेतकरी हा धानोरा येथील असून दीपक रोहिदास साळुंखे (वय 35) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगाने दि. 7 ऑगस्ट रोजी 98 हजार रुपये, तर त्यानंतर दि. 8 ऑगस्ट रोजी पुन्हा 98 हजार रुपये, असे दोन वेळेस खात्यातून एकूण 1 लाख 96 हजार रुपये परस्पर काढून घेतले. साळुंखे याना खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सायबर भामट्यांनी कशी फसवणूक केली याची माहिती सायबर गुन्हे पथकाने घेतली. तसेच सलग दोन दिवस प्रत्येकी 98 हजार रुपयांचे व्यवहार झाल्याने या प्रकारामागे नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे पथक तपास करत असून भामट्यांनी कोणत्या खातून कुठे पैसे वळते केले याची माहिती घेतली. तसेच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा सायबर पोलिसांचे पथक शोध घेत आहेत.
अनओळखींना बँकेशी संबंधित माहिती देऊ नये
इंटरनेट बँकिंग, यूपीआय, मोबाईलचा जसा वापर वाढला आहे तसे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहे. विशेषतः विविध ऑनलाईन सेवांचा वापर वाढल्याने सायबर भामट्यांचे चांगलेच फावले आहे. पूर्वी सायबर फसवणुकीचे प्रकार प्रामुख्याने शहरांमध्ये घडत असल्याचे चित्र होते; मात्र आता ग्रामीण भागातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य खातेदारांनाही लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांनी सतर्क राहावे. अनओळखीच्या व्यक्तींना ओटीपी, एटीएम कार्ड, युपीआय पीन देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








