Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अपात्र लाभार्थ्यांना दणका ठरणारी ही बातमी असून लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे तब्बल साडेचार लाखांहून अधीक सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून या योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र लाभार्थी कमी केल्याने सरकारचा आर्थिक भार कमी झाला आहे.
महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आवाका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. राज्य शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) मोहिमेनंतर आपात्र लाभार्थी कमी करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे सक्रिय लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 2.48 कोटींवरून घसरून थेट 1.65 कोटीवर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून ही आकडेवारी समोर आली आहे.

दरम्यान, हजारो अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबांकडून बेकायदेशीरपणे लाटलेले पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीआयमधून वसुलीची आकडेवारी प्राप्त झालेली नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिली आहे. तर ईकेवायसी पूर्ण न झाल्याने दुर्गम भागातल्या गरीब महिला अजूनही योजनेपासून वंचित असल्याचा दावाही आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केला आहे.










