MP Toxic Liquor Case: संपूर्ण मध्य प्रदेशाला हादरवणारी सागर जिल्ह्यातील ही घटना आहे. सरकारने देखील याचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. दरम्यान सागर विषारी दारू प्रकरणामध्ये रुग्णालयात उपचार घेत असताना आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वृत्तांनुसार मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. प्रशासनाने आतापर्यंत केवळ ११ मृत्यूंची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस छापे टाकत आहेत.
सागर जिल्ह्यात संशयित विषारी आणि अवैध दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंची मालिका सुरू आहे. सोमवारी सकाळी रुग्णालयात उपचार घेत असतांना आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तांनुसार मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. तथापि, प्रशासनाने अद्याप मृतांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.

सोमवारची स्थिती
धुरमार येथील रहिवासी महेश रावत (५५) यांचा सोमवारी सकाळी बांदा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, चापरी गावातील रहिवासी श्याम बाई अहिरवार (५०) यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला, तर पापट गावातील रहिवासी कृष्ण कुमार लोधी यांचा बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये (बीएमसी) उपचार घेत असताना मृत्यू झाला.
यापूर्वी प्रकृती गंभीर असल्याने भोपाळला एअरलिफ्ट करण्यात आलेल्या राम प्रसाद लोधी यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्यांचे वडील गोविंद लोधी यांचेही रविवारी निधन झाले. राम प्रसाद यांचा धाकटा भाऊ, भुरे लोधी, सध्या बीएमसीच्या रुग्णालयात दाखल आहे. बामुरा भेदा गावात आतापर्यंत सहा मृत्यूंची नोंद झाली आहे.
प्रशासनाकडून ११ मृत्यूंचा दुजोरा
स्थानिक प्रशासनाने रविवारी संध्याकाळी पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकरणात ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. तेव्हापासून मृतांच्या संख्येबाबत कोणतेही नवीन अधिकृत निवेदन किंवा प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले नाही. रुग्णालयाच्या अहवालानुसार मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तथापि, २२ मृत्यूंची अधिकृत प्रशासकीय पुष्टी मिळालेली नाही. मृतांची संख्या अस्पष्ट असल्याबद्दल कुटुंबीय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनावर मृत्यूंची खरी संख्या लपवल्याचा आरोप केला आहे.
११२ रुग्णांवर उपचार सुरू
दरम्यान विषारी दारूच्या सेवनाने बाधित झालेले ११२ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यापैकी सर्वाधिक ८९ रुग्ण बुंदेलखंड मेडिकल कॉलेज (बीएमसी), सागर येथे दाखल आहेत. त्यानंतर सागर जिल्हा रुग्णालय १६ रुग्ण, बांदा सिव्हिल हॉस्पिटल ७ रुग्ण असे एकूण ११२ रुग्णांना उपचारासाठी विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यातील अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.









